आरती कुमार राव यांचा पर्यावरण प्रेमी ते कॅमेऱ्यातून पर्यावरणासाठी काम करणं हा प्रवास मोठा रंजक आहे. लहान असताना भौतिकशास्त्र आणि लेखन यात करिअर करावं असं त्यांना वाटायचं. भारतात एकाच वेळी दोन्ही क्षेत्रात काम करता येणं अवघड. म्हणून मग त्यांनी बायोफिजिक्समध्ये मास्टर्स केलं. नंतर कळून चुकलं की आयुष्य प्रयोगशाळेत घालवणं अवघड आहे. त्यांना भोवताल खुणावू लागला, पाणी हाका मारू लागलं, म्हणतात ना पाणी तुम्हाला बोलावून घेतं तसंच आरतींच्या बाबतीत झालं. पाण्यासाठी त्यांनी एका स्थिर आयुष्यावर पाणी सोडलं.
नदीपात्र ते वाळवंट सगळी कडच्या पाण्याचा वेध त्यांच्या लेन्सने घेतला. जंगल, किनारा, काठ, वाळवंट सगळं धुंडाळून झालं आणि त्याची ओढाळ पावलं नदीच्या पाण्यात अधिक खोल रुतत गेली. निसर्ग सौंदर्या व्यतिरिक्त निसर्गाचं म्हणणं त्यांनी आपल्या फोटोतून जगासमोर मांडायला सुरुवात केली. पत्रकारिता हा पेशा स्वीकारत एका जनजागृतीच्या चळवळीत त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. नॅशनल जिओग्राफीच्या पिवळ्या चौकटी तर त्यांना आधीपासूनच साद घालत होत्या. त्या चौकटी मोडत आपल्या फोटोतून प्रेक्षकांवर छाप कशी पाडावी हे तर लहान असल्यापासूनच फोटो खाली असणाऱ्या मजकूरामुळे समजायला लागलं होतं. म्हणून मग फोटो फक्त क्षण कैद करण्याचं माध्यम न ठेवता लोकांपर्यत पोहोचण्याचं माध्यम ठेवावं हा निग्रह झाला आणि यातूनच गेलं दशकभर राव यांचे फोटो पाण्याची घुसमट, नद्यांचे हुंकार, आणि जमिनीची तळमळ सांगतायत.
पाणगोष्टी सांगणारे फोटो
आरती कुमार राव यांचे फोटो नद्यांच्या कथा सांगत असतात, नद्या खवळल्यावर किती रौद्र दिसतात हे सांगतात, पात्रं बदलतात तेव्हा कशा गांगरून जातात हे सांगतात. नदी आणि तिच्या आजूबाजूच्या प्रदेशातल्या लोकांचं आयुष्य दाखवतात. त्यांच्या फोटोतून निसर्ग त्याच्या व्यथा सांगत राहतो आणि आरती कुमार राव त्या व्यथेमागच्या कथा लोकांना येऊन सांगतात. ब्रम्हपुत्रेच्या पात्रापासून ते एशियातल्या हत्तीच्या डोळ्यातल्या पाण्यापर्यंत फिरून आल्यावर ही त्याचा कॅमेरा विसावत नाही. तो पाणी शोधतच राहतो. पाण्याच्या मागावर असणाऱ्या बायका हा कॅमेरा टिपतो. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या बायकांच्या आकृत्या दाखवतो.
कधी तर खाडी परिसरात झाडांनी वेढलेल्या फ्रेममध्ये पाण्यात उभी असलेली, प्रकृतीशी एकरूप झालेली बाई दाखवतो. जणू बाई आणि पाणी एक आहे.

स्रोत
पाणी ज्या भांड्यात ठेऊ त्या भांड्याचा आकार घेतं तसं बाई कुठल्याही परिस्थितीत समायोजन करू शकते हे सांगत राहतो. कारण यातले बहुतांश बायकांचे फोटो हे पाठमोरे आहेत, त्यात आपल्याला चेहरा दिसत नाही. पाणी हीच त्यांची ओळख आणि पाणी हाच त्यांचा चेहरा आहे.