मंडळी, ब्रिटीश काळात भारतातून अनेक मौल्यवान गोष्टी इंग्लंडला पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील एक अमुल्य गोष्ट म्हणजे कोहिनूर. आजच्याच दिवशी १८५० साली कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरियाला पहिल्यांदा नजर करण्यात आला. त्यानंतर तो पुन्हा भारतात कधी परतलाच नाही.
मंडळी, कोहिनूर हिरा भारतातून इंग्लंडला गेला अशी माहिती आपल्या सगळ्यांनाच माहित असते पण खरं तर हा हिरा भारत, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान या तीन देशातून फिरून इंग्लंडला स्थायिक झाला आहे. असं म्हणतात की कोहिनूर आपल्या सोबत दुर्दैव घेऊन येतो. कोहिनूरचा इतिहास बघितला तर ते खरंही ठरतं. हा ऐतिहासिक हिरा अनेक सुलतान आणि राजांच्या हाती लागूनही त्यांना लाभला नाही.

आज या ऐतिहासिक दिवशी आम्ही सांगणार आहोत कोहिनूरच्या संपूर्ण प्रवासाची गाथा.
असं म्हणतात की कोहिनूर गोवलकोंडाच्या खाणीत सापडला होता. त्याच्या पहिल्या उल्लेखात कोहिनूर १३०४ साली माळवाच्या राजांकडे होता असं म्हटलं आहे. पुढे तो अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वाधीन झाला. गंमत म्हणजे कोहिनूरला त्याचं ‘कोहिनूर’ हे नाव मिळायला अजून बराच अवधी होता.





