लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. म्हणूनच भारतातील जयपूर सारख्या शहरात राहणारा एक साधा रिक्षावाला देखील फ्रान्सचा जावई होऊ शकला. आता हे जर तुम्हाला पटत नसेल तर, जयपूरच्या या राजू रिक्षावाल्याची ही हकीगत नक्की वाचा.
जयपूरच्या दलित वस्तीत जन्मलेल्या रणजीत सिंग राजचे बालपण काही फार सुखवस्तू होते असे नाही. लहानपणीच त्याने परिस्थितीचे चटके सोसले होते. प्रत्येक सामान्य आई-वडिलांची असते तशीच राजच्या आई-वडिलांचीही इच्छा होती की, आपला मुलगा शाळा शिकेल, काही तरी मोठे काम करेल आणि आपली परिस्थिती बदलेल. त्यांनी राजला शाळेत घातले, पण राजचे काही शिकण्यात आणि शाळेत मन रमत नव्हते.










