मध्यंतरी मुंबई शहरात वीज गेली होती तेव्हा किती गोंधळ झाला होता आठवतोय? शहरात लाईट जाणे म्हणजे शहर थांबणे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत पण नकळत ही यादी किती लांबत चाललीये हे आपल्याला कधीकधी लक्षातही येत नाही. इंटरनेट, वीज याशिवाय आपण आयुष्याचा विचारही करू शकत नाही. आजकाल सर्व डिव्हाईस चार्ज करावे लागतात. आता नवीन गाड्याही इलेक्ट्रिक होत आहेत. यावरून लक्षात येतं की आधुनिक जगात इलेक्ट्रिसिटी किती महत्वाची आहे.
शहरात एक बटन दाबलं की वीज चालू होते. पण आज अजूनही अनेक गावं आहेत जिथे वीज पोहोचलेली नाही. तिथले लोक अजूनही घरात दिवा लागावा म्हणून वाट पाहत आहेत. फिलीपिन्समध्ये असंच एक गाव आहे जिथे अजून वीज पोहोचली नाही. ही गरज ओळखूनच लिटर ऑफ लाईट या संस्थेने विजेसाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. त्यासाठी अगदी रोजच्या जीवनातल्या साध्या गोष्टी वापरल्या गेल्या आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या, पाणी, गॅल्वनाइज्ड स्टील आणि थोडसं ब्लिच यापासून ही वीजनिर्मिती झाली आहे.





