आपण सगळे व्यवहारी जगात संसाराच्या जबाबदार्या डोक्यावर घेऊन जगणारी माणसं आहोत. आपले हक्क शाबूत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने कागदपत्रांचा वापर करत असतो. इलेक्ट्रिसीटीची- घरपट्टीची -सोसायटीची, औषधांची बिलं आपण जपून ठेवत असतो. हे झालं रोजच्या व्यवहारातलं. ज्यांच्याकडे जमिनजुमला असतो ते दरवर्षी गावाला गेल्यावर काहीजण तलाठ्याकडून सातबारा घेऊन आपला हक्क शाबूत आहे की नाही ते तपासत असतात.
अर्थात हे सगळं कशासाठी? तर उद्या भांडायची वेळ आली तर? कोर्टात जायची वेळ आली तर? थोडक्यात कायदेशीररित्या झगडण्यासाठी ही तयारी असते. पण कज्जा-खटला इतका सोपा असतो का हो? त्यासाठी वकील लागतो, ज्याची वेळोवेळी मुकाट फी द्यावी लागते, कोर्टाने आदेश दिला तर काही वेळा अमुकएक रक्कम जमा ठेवावी लागते. कागदपत्रांच्या प्रती काढून त्याच्या फायली बनवाव्या लागतात. हे सर्व करूनही निकाल येईपर्यंत धाकधूक राहते ती वेगळीच! म्हणजेच एखादा खटला लढणं ही अत्यंत धोकादायक गुंतवणूक असते. बोभाटाच्या आजच्या लेखाचा विषय थोडा वेगळा आहे. तो असा की सध्या खटला लढण्यासाठी पतपुरवठा म्हणजे चक्क कर्ज देण्याचा एक नवा ट्रेंड जन्माला आला आहे. हा ट्रेंड नक्की काय आहे हे समजून घेणे हा लेखाचा विषय आहे.









